एकीकडे सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही आणि दुसरीकडे भीमा नदीला महापूर आला आहे. या विसंगत दृश्यामुळे भीमा नदीत वाहून जाणाऱ्या शेकडो टीएमसी पाण्याची चिंता सर्वांना सतावत आहे. उजनी धरणापासून कर्नाटक हद्दीपर्यंत भीमा नदीवर 22 बंधारे बांधण्यात आले आहेत. उजनी धरणातून 80 हजार क्युसेक आणि वीर धरणातून सुमारे 63000 क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्यामुळे हे सर्व बंधारे आता पाण्याखाली गेले आहेत. गेल्या वर्षी असाच महापूर आल्यामुळे उजनी धरणातून जवळपास 280 टीएमसी पाणी सोडून देण्यात आले होते. यंदाच्या वर्षी गेल्या आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदी वाटे सोडून देण्यात येत आहे. त्यामुळे वडापूर येथे दोन टीएमसी धरण बांधण्याचा विषय पुन्हा चर्चेत येत आहे. असे असले तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे धरण बांधणे मुश्कील आहे. कृष्णा पाणीवाटप लवादानुसार आपल्याला आता भिमेतून वाहून जाणारे पाणी अडवता येत नाही. त्यामुळे वडापूरला धरण बांधणे तर सोडाच परंतु बंधारा बांधणे देखील मुश्किल झाले आहे. वास्तविक पाहता लवादाच्या निर्णयानुसार आपणास उजनीतील डेड वॉटर वापरता येत नाही मात्र पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली आपण धरणातून वारे माप पाणी उपसा करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात पंढरपूर दौऱ्यात भीमा नदीवर नवीन बंधारे बांधण्या संदर्भात सूतोवाच केले होते. त्यामुळे या सर्व बाबींचा आता विचार होणे गरजेचे आहे.











