उजनी धरणातील प्रदूषित पाणी आणि इथून सोलापूर शहराला होणारा पाणीपुरवठा याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी आणि सिपला फाउंडेशन यांच्यावतीने उजनीतील पाण्याची तपासणी करण्यात आली. या पाण्यात कार्सोनोजेनिक हा घटक आढळतो त्यामुळे कॅन्सर होतो असे नमूद केले आहे. सोलापूर विद्यापीठाने देखील या पाण्याची संशोधन केले असून रासायनिक घटकामुळे कॅन्सरचा आजार बळावत असल्याचे जाहीर केले होते. जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी देखील उजनीचे पाणी विषारी आहे असे सांगितले आहे. विशेष म्हणजे पुणे महापालिकेचे सुमारे 500 एमएलडी पाणी कोणतीही प्रक्रिया न करता ते मुळा-मुठा नदीत मिसळते आणि तिथून पुढे ते उजनी धरणात येते. त्यामुळे उजनीतील पाणी अति प्रदूषित होऊ लागले आहे. या गंभीर बाबीकडे आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला यावर शासनाकडून काय खुलासा होणार याबाबत सोलापूरकरांना उत्सुकता आहे.











