सोलापूर – पुण्याहून सोलापूरकडे परतणाऱ्या दोन जिवलग मित्रांच्या प्रवासाचा शेवट काळाने भीषण अपघाताने केला. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळील तेलंगवाडी शिवारात सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे धोत्री गावासह संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागेश मल्लप्पा बिराजदार (वय 28) व संकल्प शिवपुत्र गुरव (वय 22) हे दोघे मित्र काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. सोमवारी रात्री MH-13 DT 8093 क्रमांकाच्या कारने ते सोलापूरकडे परत निघाले होते. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास तेलंगवाडीजवळ त्यांच्या कारने समोरून जाणाऱ्या TN-54 R 8881 क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
नागेश मल्लप्पा बिराजदार, वय 28 वर्षे, रा. धोत्री, ता. द. सोलापूर – विवाहित. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. तसेच संकल्प शिवपुत्र गुरव, वय 22 वर्षे, रा. धोत्री, ता. द. सोलापूर – अविवाहित आहे.
दोघेही अत्यंत सालस व मनमिळावू स्वभावाचे होते. दोघांची घट्ट मैत्री संपूर्ण गावात प्रसिद्ध होती. दोघांचेही वय 30 वर्षांच्या आत होते.
अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला काढली व मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मोहोळ पोलीस पुढील तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार चालकाचा ताबा सुटल्याने किंवा झोपेमुळे हा अपघात झाला असावा.
एकाच गावातील दोन होतकरू तरुणांचा अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्याने धोत्री गावावर शोककळा पसरली आहे. “कालच दोघे हसत खेळत पुण्याला गेले आणि आज त्यांच्या मृत्यूची बातमी आली,” असे सांगताना गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. मंगळवारी 3वाजण्याच्या सुमारास दोघांवर धोत्री येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे










