विरोधकांची महिलांप्रती भूमिका नकारात्मक असल्याची टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार इशारा दिला आहे. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून लोकसभेत सरकारला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेसाठीचं 131 वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत आवश्यक दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने नामंजूर झालं. विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मतं पडली. एकूण 528 खासदारांनी मतदान केलं, मात्र मंजुरीसाठी लागणारी अतिरिक्त मतं सरकारला मिळवता आली नाहीत.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8.30 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि विरोधकांवर टीका याबाबत ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विरोधकांनी महिला आरक्षण विधेयक रोखून मोठी चूक केल्याचा आरोप करत, “हा केवळ सरकारचा पराभव नाही, तर महिलांच्या हक्कांचा विरोध आहे,” असं मोदींनी म्हटलं आहे. विरोधी पक्ष आपली भूमिका योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
सध्या महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यांवरून संसदेत जोरदार राजकीय संघर्ष सुरू असून, पुढील घडामोडीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
