अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ राजेराय मठ येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त तसेच चैतन्य पादुका स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त सुरू असलेल्या उत्सवात भक्तिरसाचा सुरेल कार्यक्रम पार पडला.
दिनांक २ एप्रिल ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या उत्सवामध्ये १० एप्रिल रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था व संगीत विद्यालय यांच्या वतीने भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात युवा गायिका कु. प्रणिती चांगभले हिने “माझा भाव तुझे चरणी”, “विष्णुमय जग”, “अक्कलकोट स्वामी ची पालखी निघाली”, “बोलावा विठ्ठल”, “मन लागो रे लागे”, “वृंदावनी वेणू”, “यमुनेच्या तिरी” यांसारखी अनेक भक्तिगीते, अभंग आणि गवळणी सादर करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तिच्या सुरेल सादरीकरणाला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
या प्रसंगी ह.भ.प. ज्योतीराम महाराज चांगभले, ह.भ.प. किरण महाराज शेटे, ह.भ.प. गणेश महाराज चांगभले, ओम माशाळ, ओम वाघमारे, ऋतुराज भोसले, वरद खाडे, समर्थ गुरव, गणेश शेटे, केशवराज शेटे, वर्षाराणी चांगभले, महादेव कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष शरद फुटाणे, उपाध्यक्ष विकास दोडके, सचिव किसन झिपरे व इतर विश्वस्त मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले
.


