सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मोहोळ मध्ये शुक्रवारी रात्री माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा या गावातील वाद मिटवण्यात आला. छत्रपती शिवरायांचा पुतळा आमच्या जागेवर बसविला या आरोपातून गेल्या तीन दिवसापासून गावात मराठा आणि धनगर समाजाने परस्पर विरोधी आंदोलन सुरू ठेवले होते. लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर, तसेच मनोज जरांगे पाटील हे देखील या आंदोलनात उतरू लागल्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोन्ही समाजाचा वाद काल मिटवला. गावात असलेल्या सरकारी जागेवर हा पुतळा शिफ्ट करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक कोटी रुपयांचा निधी देखील जाहीर केला. दोन्ही समाजात यावर एकमत झाल्यामुळे इथला टोकाला गेलेला वाद मिटला. नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी, माजी आमदार राजन पाटील यासह दोन्ही समाजाचे नेते यावेळी उपस्थित होते. सोलापूर शहरात यंदाच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुका काढण्यावरून दोन गट पडले होते. मात्र या वादावर देखील पडदा पडला असून रविवार दिनांक 19 एप्रिल रोजीच जयंती मिरवणूक काढण्यावर एकमत झाले. हे दोन्ही महत्त्वाचे आणि चांगले निर्णय झाल्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील तणावाचे वातावरण पूर्णपणे निवळले.

