सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच समाजातील नेते विकास कामावर कधी एकत्र येत नाहीत. आक्रमकपणे मूलभूत प्रश्न मांडत नाही. त्यामुळे सोलापूरच्या विकासाचे प्रश्न बाजूला राहतात. सोलापूर शहरात महापालिकेची दोन एकर जागा लिंगायत स्मशानभूमीला देण्यावरून गेल्या पंधरा दिवसापासून लिंगायत समाजात दोन गट पडले आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नगरसेवकांचा गट तसेच आमदार सुभाष देशमुख होटगी मठाला ही जागा देण्यासाठी आग्रही आहेत तर दुसरीकडे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नगरसेवकांचा गट सिद्धेश्वर देवस्थानला ही जागा देण्यासाठी आक्रमक आहेत . श्रेय वादासाठी अशा विषयांना लोकप्रतिनिधी खतपाणी घालत आहेत. सोलापूर शहरात दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुका एकोप्याने काढल्या जातात. यंदाच्या वर्षी मात्र रिपाई नेते राजा सरवदे यांनी मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढणार असे जाहीर केले. तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळाने आम्ही रविवार दिनांक 19 एप्रिल रोजीच मिरवणुका काढणार. हीच तारीख सर्वांसाठी सोयीस्कर आहे असे ठासून सांगितले. अद्याप यावर एकमत झाले नाही. माढा तालुक्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा अंजनगाव खिलोबा या गावात बसवल्यामुळे धनगर समाज तसेच मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच काही लोकप्रतिनिधी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना काही नेते यामध्ये तेल ओतण्याचे काम करत आहेत. त्यामुळे एकूणच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गटबाजी तसेच तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे याचा फटका विकास कामाला बसतो त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.









