येस न्युज मराठी नेटवर्क :राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमीकमी होताना दिसत आहे. आज दिवसभरात ९ हजार १६४ जणांनी करोनावर मात केली. तर, राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख ९७ हजार २५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ९२.२३ टक्के आहे. मागील काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. हे चित्र नक्कीच दिलासादायक असले तरी देखील नागरिकांनी सणासुदीच्या काळात अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे.
राज्यात आज दिवसभरात ४ हजार ९०७ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ३१ हजार ८३३ वर पोहचली आहे. यामध्ये ८८ हजार ७० अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १५ लाख ९७ हजार २५५ व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४५ हजार ५६० जणांच्या संख्येचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.










