येस न्यूज चॅनलचा आढावा
( राजकीय वार्तापत्र भाग दोन )
येस न्यूज चॅनलच्या दर्शकांनो, राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत परिषदेच्या निवडणुकीत सत्ता काबीज करण्याच्या लालसेपोटी महायुती कशी धोक्यात आली याचे विश्लेषण आपण राजकीय वार्तापत्र भाग एक मध्ये केलं होतं. आता या दुसऱ्या भागामध्ये महाराष्ट्रातील राजकारण किती खालच्या पातळीवर घसरत चाललेलं आहे हे पुराव्यासह स्पष्ट करीत आहोत. दर्शक हो गोंदिया येथे जाहीर प्रचार सभेत बोलताना नाना पटोले यांनी ‘तेरे बाप का राज है क्या?’ असे विचारत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बाप काढला. यावर महसूलमंत्र्यांनी संयमाने उत्तर देत ‘माझा बाप काढणे तुम्हाला महागात पडेल.’ अशी प्रतिक्रिया दिली.
दुसरीकडे मालवण मधील एका भाजपा कार्यकर्त्याच्या घरामध्ये स्टिंग ऑपरेशन घडवून आणलेल्या शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल होताच भाजपाचे आमदार त्यांचे बंधू नितेश राणे यांनी माझ्या भावाला बळीचा बकरा बनवण्यात आला असून त्याच्या समर्थनार्थ एकही शिवसेनेचा नेता पुढे का येत नाही असा सवाल विचारला आहे. महाराष्ट्रात राणे घराण्याचे राजकीय वजन पाहता त्यांना कोणी बळीचा बकरा बनवू शकतो का हा खरा प्रश्न आहे. याच घटनेला अनुसरून माजी मंत्री शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना राजकीय जीवनातून संपवण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यावर देखील नारायण पुत्र नितेश यांनी माझ्या बापाला संपवण्याचा घाट कोणी घातला हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे, असे सांगत दीपक केसरकर यांचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. हे सर्व घडत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणेंची पाठराखण करत त्यांंना सच्चा शिवसैनिक असल्याची पोच पावती दिली.
एकीकडे एकनाथ शिंदे हे भाजपाला घायाळ करण्याचा प्रयत्न करत असतानाच एकनाथ शिंदे यांनी संगमनेर येथील जाहीर सभेत मंत्री उदय सामंत यांना फोन करून एमआयडीसी प्रकल्प कधी मंजूर करणार अशी विचारणा करत आणि त्यांचा होकार मिळवत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. नो रिझल्ट ऑन द स्पॉट डिसिजन म्हणत त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली. हाच धागा पकडत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी शिंदेंच्या या शैलीची खिल्ली उडवली. राजकारणात बनवाबनवी ही करावी लागते, पण अशी ही बनवाबनवी कधी पाहिली नसल्याचे सांगत एकनाथ शिंदे उद्या पाणी नसेल तर पाणी मंजूर करेन, डोंगर नसेल तर डोंगर मंजूर करेन, धरण मंजूर नसेल तर धरण मंजूर करेन, नदी पण मंजूर करेन असे आश्वासन दिले तर त्यात आश्चर्य वाटून घेऊ नका, अशा आशयाचे विधान करून एकनाथ शिंदे यांच्या फोनाफोनी शैलीची खिल्ली उडवली.
दुसरीकडे आमदार उत्तर जानकर यांनी देखील भाजपा हा सर्वात भ्रष्ट पक्ष असून सोलापूर जिल्ह्यातील बारा पालिकांसाठी प्रत्येकी 25 कोटी प्रमाणे 300 कोटी रुपये जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आणले आहेत, असा सणसणाटी गौप्यस्फोट केला. त्याला भरीस भर म्हणून अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांनी बीजेपी पूर्णपणे बाटलेला पक्ष असून फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललेलं आहे,अशी चपराक लगावली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील यामध्ये मागे राहिलेले नाहीत. एकनाथ शिंदे आपला नंबर एकचा अडथळा असल्याचे सांगत दोन नंबर तो दोन नंबरच राहणार. दोन नंबरला काही किंमत नसते असे म्हणत एकनाथांच्या स्वाभिमानाला जबर तडाखा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या आरोप – प्रत्यारोपात न अडकता ऑपरेशन लोटस शांतपणे आणि अधिक प्रभावीपणे राबवत असल्याचे प्रत्यंतर सोलापूर शहरात पहायला मिळाले. गोल्डन वूमन म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारी यांच्यासह अनेक नगरसेवकांचा जथ्था आपल्या ताफ्यात आणण्याची किमया करून दाखवली. त्यांच्या या ऑपरेशनमुळे सोलापुरातील विजय देशमुख आणि सुभाष देशमुख या जोडगोळीचे म्हणणे विचारात न घेता त्यांच्या विरोधातील माणसे भाजपामध्ये नक्कीच येतील असे एकंदरीत दिसून येत आहे. महायुतीतील राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये रंगलेला हा कलगीतुरा दोन तारखेनंतर तरी संपेल का ?, राज्यातील त्यांची सत्ता टिकेल का ?, स्वाभिमान दुखावल्याने बीजेपी मित्र पक्षांवर कारवाई करत त्यांना दूर लोटेल का ? असे अनेक प्रश्न या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमुळे निर्माण झाले आहेत.
इकडे उबाठाच्या गटात पण सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. देवरुखमधील एका जाहीर सभेत बोलताना उबाठाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी विनायक राऊत यांचे नाव न घेता मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या दोघांमधील अंतर्गत कलह वाढत चालल्याचे पाहून खुद्द उद्धव यांना दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागली. या इलेक्शनच्या रणधुमाळीत बीड येथील संतोष देशमुख खून प्रकरणी तिथीनुसार 29 तारखेला वर्षपूर्ती झाली. अद्यापही आरोपी मोकाट असून धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात न आल्याने मनोज जरांगे पाटलांनी सरकारला खडे बोल सुनावले आहे. काहीही झाले तरी खऱ्या गुन्हेगाराला सोडणार नाही, जोपर्यंत धनंजय मुंडेला सहआरोपी करत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला. खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील जरांगेंच्या सुरात सूर मिसळून याप्रकरणी सरकारच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले. आणि सर्वात विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या पुण्यतिथीला उपस्थिती दर्शवत मस्साजोग येथे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करत या प्रकरणी न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.
दर्शकहो प्रत्येक नेता आपला पक्षाच्या विजयासाठी धडपडत आहे. प्रत्येक पक्ष एकमेकांविरुद्ध लढत आहे. सूज्ञ मतदारांनी सदसदविवेेबुद्धीने विचार करून मतदान करावे, असे आवाहन आम्ही येस न्यूज चॅनलच्या वतीने करीत आहोत. लोकशाही वाचवण्यासाठी व ती अधिक सदृढ होण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क जरूर बजावावे, आपले मत वाया जाऊ देऊ नका, असे आवाहन करतो.
तूर्तास इतकेच.
धन्यवाद!

