सोलापूर – बिटरगाव वांगी येथे घडलेल्या मयत प्रभावती डोंगरे यांच्या खुना प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी गु. र. क्र. ०६६३/२०२४ नोंदविण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), १८९(२), १९०, १९१(२), ११५(२), ३५२ आणि ३५१(३) अन्वये दिनेश दत्तात्रय पांढरे (वय ३२, रा. बिटरगाव वांगी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्यासह एकूण ५ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात झाला होता. या घटनेत प्रभावती डोंगरे यांचा मृत्यू झाल्यानंतर फिर्यादी शिवाजी हरिदास डोंगरे यांनी दिलेल्या जबाबावरून सहआरोपी राणी पांढरे, ओंकार पांढरे, सत्यम पांढरे आणि आशा पांढरे यांनी मृतकास मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले होते.
आरोपी दिनेश पांढरे यास ११ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथील दाखल जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तब्बल एक वर्षापेक्षा अधिक काळ कारावासात असलेल्या आरोपीतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ येथे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता, तद्नंतर जामीनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जात आरोपीच्या वकिलामार्फत युक्तिवाद करण्यात आला की मृत्यूप्रकरणी दिनेश पांढरे याची कोणतीही थेट भूमिका सिद्ध झालेली नाही. मृतकास मारहाण केल्याचे आरोप केवळ सहआरोपी राणी पांढरे आणि आशा पांढरे यांच्यावर आहेत. आरोपीवर फक्त फिर्यादीस लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचा आरोप असून मृत्यू होण्यास कारणीभूत ठरेल असे कोणतेही कृत्य त्याच्याकडून झाले नाही. तपास पूर्ण झाला आहे, चार्जशीट दाखल आहे, खटल्यात कोणतीही प्रगती नाही आणि खटला संपण्यास आणखी वेळ लागणार असल्याने आरोपीला पुढे कारागृहात ठेवणे न्याय्य नाही, असा युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे मा. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपी दिनेश दत्तात्रय पांढरे यास सशर्त जामीन मंजूर केला आहे. संबंधित प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड. अक्षय जगताप, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. पैगंबर सय्यद, ॲड. मोहीम पठाण, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मनिष बाबरे, ॲड. अभिषेक नागटिळक, ॲड. रोहित थोरात, ॲड. सलामत पटेल आणि ॲड. त्वरिता वाघ यांनी काम पाहिले.

