दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ आणि गोंधळ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मागील परीक्षेत ज्या केंद्रांवर कॉपी केसेस झाल्या, त्यांची मान्यता रद्द करण्यात आली असून सोलापूर जिल्ह्यातील 20 केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. राज्यभरातील असे तब्बल 242 केंद्र रद्द करण्यात आले आहेत.
रद्द करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांची अधिकृत यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करता येणार नसल्याचे सांगत शिक्षण मंडळाने ही केंद्रे दोन तीन वर्षापूर्वीच संवेदनशील म्हणून घोषित केले होते आणि गतवर्षीपासून परीक्षेसाठी या केंद्रांवर विशेष भरारी पथके नेमणे, तसेच केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक इतर शाळांमधून नियुक्त करणे असे कठोर उपाय योजले होते.
तरीही काॅपींचा सुळसुळाट चालूच राहिला.कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी बोर्डाने कठोर पावले उचलले असून मागील दोन वर्षात परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल लागू केले आहेत.विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळांमध्ये परीक्षा देण्याची पद्धत, शिक्षक व पर्यवेक्षकांसाठी सरमिसळ पद्धत तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बंधन अशा अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या.तरीही काही केंद्रावरून कॉपी केसेस आढळल्याने कठोर कारवाई करण्याची गरज बोर्डाला भासली.आता बोर्डाने या संपूर्ण प्रकाराला आळा घालण्यासाठी ज्या केंद्रांवर कॉफीचे प्रकार आढळले त्या केंद्राची मान्यता यापुढे कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे या केंद्रावर होऊ घातलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार नाहीत.
नवीन केंद्राच्या तपासणीला 15 नोव्हेंबर पासून जिल्हास्तरावर सुरुवात करण्यात आली असून संबंधित केंद्रावर सीसीटीव्ही व्यवस्था, पक्की इमारत, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची सुविधा, विद्यार्थ्यांची बैठक योजना, सुरक्षेसाठी वॉल कंपाऊंड या निकषांची पाहणी केली जाणार आहे.
ही माहिती संबंधित जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी बोर्डाकडे पाठवायची असून दहा डिसेंबर पूर्वी मंडळाच्या सर्व विभागीय बैठकीत अंतिम केंद्र यादी निश्चित केली जाईल, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
नवीन परीक्षा केंद्रांची यादी डिसेंबरमध्ये जाहीर केली जाणार असून विद्यार्थ्यांनी व पालकांनी अधिकृत नोटिफिकेशन्स वर लक्ष द्यावे असे आवाहन बोर्डाने केले आहे.

