करमाळा – नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे सर्व पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असताना, दुसरीकडे मात्र पक्षांमधील अंतर्गत नाराजी नाट्य समोर येत आहे. यातच आता एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. करमाळ्यातील 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.
राज्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार जयवंतराव जगताप यांची करमाळा नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि या नियुक्तीनंतर तत्काळ पक्षात मोठी फूट पडल्याचे चित्र आहे.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणातील महत्त्वपूर्ण असलेले दिग्विजय बागल यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले. या नाराजीतूनच आक्रमक भूमिका घेत बागल गटातील 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले.
याशिवाय, या नाराज पदाधिकाऱ्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या गटाने नोंदणी केलेले जवळपास 20 हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार आहेत. हे सर्व वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाद्वारे पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

