बांधकाम कार्यालय हे नागरी सहाय्यता केंद्र आहे : आडम मास्तर
सोलापूर : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार आहेत. या कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायद्याचे संरक्षण मिळावे म्हणून सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने तत्कालीन आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी विधान सभेत आवाज उठवून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यास राज्य शासनास भाग पाडले. म्हणून आज बांधकाम कामगारांना जुजबी लाभ मिळत आहेत. पण हे तुटपुंजे लाभ बांधकाम कामगारांना स्थैर्य प्राप्त करून देणारे नाहीत. याकरिता बांधकाम कामगारांची एकजूट आणि रस्त्यावरची लढाई अनिवार्य आहे. सहा.कामगार आयुक्त कार्यालय येथे बांधकाम कामगारांची अधिकृत नोंदणी करून कल्याणकारी मंडळाचे लाभ मिळवून देण्याकरिता लाल बावटा बांधकाम कामगार युनियनच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सहाय्य केले जाईल. हे कार्यालय केवळ बांधकाम कामगारांसाठी नसून सर्व नागरी समस्या निवारण करणारे केंद्र आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा व चळवळीत सक्रीय व्हावे असे आवाहन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी जेष्ठनेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केले.
बुधवार दि. ८ जून २०२२ रोजी कोनापुरे चाळ येथे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सलग्न लाल बावटा बांधकाम कामगार युनियन कोनापुर चाळ शाखेचे उद्घाटन माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सिटूचे राज्य महासचिव कॉ.एम.एच.शेख यांनी बांधकाम कामगार आणि घरेलू कामगार यांच्या समस्या दिवसेंदिवस जटील होत आहेत. त्याच्या निवारण्याकरिता सरकार कोणतेच प्रयत्न करताना दिसत नाही. उलट आहे त्या यंत्रणेत ढिलाई आलेली आहे. वास्तविक बांधकाम आणि घरेलू कामगारांमध्ये अज्ञान व अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना शासनाच्या योजनेची माहिती, लाभ घेण्याची पद्धत, संबंधित कार्यालय याबाबत माहिती नसते. म्हणून त्यांच्यासाठी सिटू च्या माध्यमातून हे कार्यालय खुले करण्यात आले आहे. असे प्रतिपादन केले.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव मंडळ सदस्य कॉ. रंगप्पा मरेड्डी यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे सक्षम तरुण नेतृत्व कोनापुरे चाळ परिसरातून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. तेंव्हा आपण सर्व नागरिकांनी विकासाची कास धरू या असे आग्रही आवाहन केले. यावेळी डी.वाय.एफ.आय.चे केंद्रीय समिती सदस्य अनिल वासम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.अब्राहम कुमार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुर्यकांत केंदळे यांनी केले.
यावेळी कोनापुरे चाळ शाखेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर डी.वाय.एफ.आय.चे राज्य उपाध्यक्ष विक्रम कलबुर्गे, जांबमुनी मोची समाज गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन कुर्मय्या म्हेत्रे, तानाजी जाधव, राम मरेड्डी, प्रदीप मरेड्डी, सेनापती मरेड्डी आदींची उपस्थिती होती.
यावेळी १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प व शालेय साहित्य देऊन करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेनापती मरेड्डी, हणमंतू पेद्दे,उमेश म्हेत्रे,राजू म्हेत्रे, तिमन्ना आनंद,राजू हलकट्टी,भीमाशंकर पेद्दे,विनायक भंडारे,मल्लिकार्जुन म्हेत्रे, नरसिंग तूर्बेकर,राम मरेड्डी,किरण बाईमनी,वैभव शासम,बाळू गायकवाड,रेवण कोंबेकर,संतोष मार्गेल,विजय मरेड्डी,जयवंत होसमनी,मल्लाप्पा दीन्नी, पवन भोगे आदींनी परिश्रम घेतले.