सोलापूर, दि.30: मागील वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जग व्यापले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे मानसिक तणावाने आत्महत्या आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढ आहे. ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेमधून कोरोना रूग्ण आणि ग्रामस्थांमधील ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
कोरोनापेक्षा दवाखान्यात राहण्याच्या भीतीने अनेकजण तपासण्या करायला तयार नाहीत. बरेचजण मानसिक तणावाखाली सतत वावरत आहेत. कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आला तर अख्ख कुटुंब तणावात येत असल्याचे श्री. स्वामी यांना निदर्शनाला आले, त्यातूनच हा उपक्रम सूचल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाग्रस्त रूग्णांना विविध प्रकारचा औषधोपचार, ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे, मात्र रूग्णांनी औषधोपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला तर रूग्ण बरा होत आहे. सतत ताणतणावाखाली राहिल्याने अनेकांना डोकेदुखी, हृदय ठोके वाढणे, चीडचीड, निद्रानाश, भूक न लागणे असे आजारही बळावल्याचे निदर्शनाला येत आहे.
वेळीच आवर घालण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांना आणि कोविड केअर सेंटरमधील रूग्णांना ताणतणाव कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कोविड रूग्णांना आणि ग्रामस्थांना सुरूवातीला ऑडिओ, व्हिडीओच्या माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
लाऊडस्पीकरून प्रचार, प्रसार
कोरोनामुळे सर्वठिकाणी तज्ज्ञ जाणे शक्य नाही, गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायत, मंदीर किंवा मस्जिद याठिकाणी असणाऱ्या लाऊडस्पीकरवरून किंवा भाड्याने घेऊन ताणतणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवाय ऑडिओ, व्हिडीओद्वारेही कार्यशाळा घेण्याचे नियोजन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये मानसोपचार तज्ज्ञ
कोविड केअर सेंटरमध्ये मानसोपचार तज्ज्ञ, व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार यांच्या माध्यमातून ताणतणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जीवन जगण्याची इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टीकोन शिकविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण करणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले.