मुंबई : देशभरात उन्हाळ्याच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, तरीही महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. राज्यात आजपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आजपासून चार दिवस पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
राज्यात 18-21 मार्च 2021 दरम्यान मध्यम स्वरुपाचं पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. इतकंच नाहीतर भारतीय हवामान खात्याने काही ठिकाणी विजा आणि गारपीटीची शक्यताही वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर ,भंडारा, गोंदिया नांदेड आणि वर्धासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात गोव्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.