सोलापूर शहरात दमाणीनगर येथे 1922 साली इंग्रजांनी बांधलेला रेल्वे ब्रिज आज पहाटेपासून मरीआई चौक आणि भैय्या चौक या ठिकाणी पत्रे मारून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. 103 वर्षाचा हा ब्रिज झाल्यामुळे 14 डिसेंबर रोजी हा ब्रिज पाडला जाणार आहे. महापालिका आणि पोलीस खात्याने सुचविलेले पर्यायी मार्ग अरुंद असल्यामुळे वाहतूक समस्या जाणवू लागली आहे. हा ब्रिज पाडणार हे दोन वर्षापासून निश्चित झाले असताना महापालिकेने अवंती नगर ते सीएनएस हॉस्पिटल पर्यंत जाणाऱ्या 54 मीटर रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले. आता हे काम दिवस-रात्र पद्धतीने युद्ध पातळीवर सुरू आहे. ब्रिज आज बंद झाला तरीही 54 मीटर चे काम काम अर्धवट आहे. आणखी आठ दिवस वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार आहे. अवंती नगर येथील रेल्वे अंडरब्रीजच्या दुतर्फा सिमेंटचा अप्रोच रोड केला जात असून त्यावरून वाहतूक सुरू करण्यासाठी किमान चार-पाच दिवसाचा अवधी द्यावा लागणार आहे. मरीआई चौकातून शेटे वस्ती येथील अरुंद रेल्वे भोगद्यातून ये- जा करण्यासाठी बुधवारी सकाळपासून मोठी गर्दी झाली. या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस देखील नियुक्त केले आहेत. जुना हिरज नाका.. तसेच निराळे वस्ती या दोन्ही मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. महापालिकेले अजूनही हे खड्डे बुजवले नाहीत हे दुर्दैव.

