येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यात हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनही चांगल्या पद्धतीने सुरू असल्याने १५ ऑगस्टच्या पूर्व संध्येला जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतीच्या स्वयंघोषणेने हागणदारीमुक्त अधिक ( ओडीएफ प्लस ) होणार असून आणखी १० अशा एकूण २१ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले ,सन २०१८ मध्ये स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत.सध्या जिल्ह्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सुरू आहे.त्यामुळे अक्कलकोट – चपळगाव , बार्शी – ढोराळे , करमाळा – सरपडोह ,माढा – फुटजवळगाव , माळशिरस – मांडवे , मंगळवेढा – देगाव , मोहोळ – अनगर , सांगोला – यलमार मंगेवाडी , पंढरपूर – तावशी , उत्तर सोलापूर – शिवणी , दक्षिण सोलापूर – माळेगाव अशा एकूण ११ ग्रामपंचायतींनी ओडीएफ प्लस झाले असल्याचे स्वयंघोषणा केली असून १५ ऑगस्टला याबाबत ग्रामसभेला ठराव करणार आहेत.
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या १५ मार्च २०२१ च्या शासन निर्णयानुसार स्वच्छतेमधील शाश्वतता – वैयक्तिक शौचालय बांधकाम व नियमित वापर , वैयक्तिक व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन , वैयक्तिक व सार्वजनिक घनकचरा व्यवस्थापन , गावाची वैयक्तिक व सार्वजनिक दृष्यमान स्थिती , सार्वजनिक शौचालय स्थिती, गावातील सार्वजनिक ठिकाणाची सुविधा ( शौचालय , पाण्याची सुविधा) , घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन , प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व मैला गाळ व्यवस्थापन या निकषांची पूर्तता करुन ग्रामपंचायती हाणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस ) केल्या जात आहेत.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये हाणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस ) च्या निकषांची उत्स्फुर्तपणे पूर्तता करुन स्वच्छता शाश्वत ठेवावी असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) गोरख शेलार यांनी केले आहे.