सोलापूर महापालिकेत प्रचंड असे बहुमत देऊन नागरिकांनी भाजपवर विश्वास व्यक्त केला. मात्र भाजपमधील गटबाजी काही थांबायला तयार नाही. याचा फटका विकास कामावर बसणार ही नक्की. भाजपा शहर युवा मोर्चाच्या निवडी करताना समतोल साधला नाही हे कारण देत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कुलथे यांच्यासह त्यांच्या जम्बो कार्यकारणीच्या निवडीस स्थगित दिली. शिवाय रोहिणी तडवळकर या नगरसेवक देखील असल्यामुळे त्यांचा हस्तक्षेप प्रत्येक कामात मांडला आहे . महापालिकेत सध्या बजेटवर चर्चा सुरू आहे. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख महापालिकेच्या कामकाजात कोणताच हस्तक्षेप करत नाही. आमदार देवेंद्र कोठे हे प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेवून असतात. महापौर विनायक कोंडयाल, स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते या सर्वांचा समतोल साधण्यासाठी सभागृह नेते नरेंद्र काळे यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सोलापूर शहराचा नवीन विकास आराखडा, रखडलेले उड्डाणपूल,बीओटी प्रकल्प, पाणीपुरवठ्याबाबत असंतोष, महापालिकेचे उत्पन्न वाढवणे, शहरातील डीपी प्लॅन मधील रस्त्यांचा विकास करणे अशा कितीतरी मूलभूत प्रश्नांबाबत बजेट बैठकीमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. सोलापूर शहरातील तीनही आमदारांनी याबाबतीत लक्ष दिले तर ही कामे वेगाने मार्गी लागू शकतात नाहीतर विकास कामांन ऐवजी गटबाजीचेच वारंवार दर्शन होईल हे नक्की.

