प्रभाग एक मध्ये शिवसंपर्क अभियान संपन्न
सोलापूर – राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने सध्या राज्यातील वाड्या-वस्त्यांवर आणि शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये शिवसंपर्क अभियान मोठ्या उत्साहात पार पडत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक एक मधील शिवसंपर्क अभियानाची बैठक रविवार दिनांक १८ जुलै रोजी मड्डी वस्ती येथील अक्कमहादेवी मंदिरात पार पडली. याप्रसंगी मंचावर शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, माजी नगरसेवक प्रमोद काशीद, विजय पुकाळे, रविकांत कांबळे या भागातील उपशहरप्रमुख तथा या बैठकीचे आयोजक संताजी भोळे, सोमनाथ शिंदे, गुत्तरगी, शिवपुत्र जमादार, रवी हक्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना पुरुषोत्तम बरडे म्हणाले रामभाऊ गुत्तरगी यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली तो काळ अतिशय संघर्षाचा होता. या भागात त्या काळी प्रस्थापितांची गुंडगिरी चालायची अन् शिवसेनेचे पदाधिकारी सायकलवर फिरुन प्रचार करायचे. ऐन मतदानादिवशी गुत्तरगी यांनाच डांबून ठेवण्याचा प्रकार घडला होता. तरीही लोकांनी त्यांना चांगलं मतदान केलं. या निवडणुकीत पराभूत होऊन सुध्दा गुत्तरगी यांनी जनसंपर्क कमी होऊ दिला नाही. ते शिवसेनेच्या माध्यमातून कार्यरत राहिले अन् याचा परिणाम म्हणून पुढच्या निवडणुकीत धनदांडग्यांना चारीमुंड्या चित करुन ते शिवसेनेचे नगरसेवक बनले. सतत लोकांची कामे करणाऱ्या या नेत्याचा मृत्यू सुध्दा कार्यमग्न असताना हृदयविकाराचा झटका आल्याने झाला. पुढे त्यांच्या पत्नींना या भागातील नागरिकांनी धनुष्यबाणाचे शिलेदार म्हणून पालिकेत पाठविलं. त्यानंतर मिनाक्षी ज्याई व जमादार ताई यांच्या रुपाने सुध्दा शिवसेनेलाच या भागातील नागरिकांनी मतांचा आशीर्वाद दिला. हा इतिहास कधीही विसरता येणार नाही असं सांगतानाच बरडे पुढे म्हणाले की, आत्ता शिवसेनेचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आगामी काळात इथे सेनेचेच नगरसेवक निवडून आणून सत्तेची मदत घेत या समाज घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचविणे हेच आत्ता उद्देश आहे.
शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी संघटन शक्तीचं महत्त्व विशद करत शिवसैनिकांनी एकदिलाने सक्रिय राहण्याचे आवाहन केले. यापुढे परका उमेदवार लादला जाऊ नये याकरिता आपलेच बळ वाढविण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी करावा असे आवाहनही केले. विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांनी पालिकेतील भाजपाच्या कारभाराचे वाभाडे काढले आणि सध्या उध्दवसाहेबांच्या नेतृत्वावर सर्वांचा विश्वास असल्याचे म्हटले. उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी शहरातील सर्व भागातील समस्यांवर एकत्रित येऊन मोर्चा काढण्याची गरज बोलून दाखविली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाखाप्रमुख नागेश कोळी, बिरुदेव लवटे, बाबा निशाणदार, अविनाश भोळे, सातू कोळी, श्रीशैल हिरेमठ, विष्णू शेकदार, उमेश बडवणे, लक्ष्मण भास्कर, राजेश नागणे, रविकांत गायकवाड, तुषार आवताडे, राज पांढरे व बसवराज जमखंडी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पुकाळे यांनी केले तर आभार संताजी भोळे यांनी मानले.
लक्ष्मण विटकर यांचा शिवसेनेत प्रवेश
तुळजापूर नाका परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व वडार समाजातील युवा नेतृत्व लक्ष्मण विटकर यांनी आज त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू आसा शब्द यावेळी त्यांनी दिला.