जागतिक चिमणी दिन ; पोलीस आयुक्तलय ,एन सी सी एस आणि भू.म .पल्ली कन्या प्रशालेचा संयुक्त उपक्रम
सोलापूर – शहरातील सिमेंटच्या इमारतींमुळे अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा असलेल्या चिमण्यांची संख्या रोडावली आहे .जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधत आपल्या घराभोवती ते परत येण्यासाठी त्यांची घरटी बनविण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थीनीनी दोन हजार घरटी बनविली. या कार्यक्रमाची सुरुवात पोलिस आयुक्त हरिष बैजल यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त पांडुरंग दिड्डी, विजयकुमार गुलापल्ली,एनसीसीएस चे भरत छेडा, मुख्याध्यापिका गीता सादूल,उपमुख्याध्यापक ,युवराज मेटे , पर्यवेक्षिका प्रणिता सामल हे उपस्थित होते . प्रास्ताविकात बोलताना गीता सादूल यांनी जैवविविधतेत प्रत्येक सजीवाचे रक्षण करणे महत्वाचे आहे . चिऊताईसाठी घरटी बनवीत ते नामशेष होण्यापासून वाचविणे हा उद्देश आहे . महाराष्ट्रात सोलापूरची ओळख स्पॅरोसिटी अशी व्हावी असे बैजल साहेबांचे स्वप्न असून खारीचा वाटा उचलत उपक्रमात सहभागी झालो आहोत . असे त्या म्हणाल्या .
पोलीस आयुक्त हरिष बैजल म्हणाले की, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार होणे आवश्यक असून त्यातून भावी पिढी तयार होते .लोकसंख्येच्या प्रमाणात चिमण्यांची संख्या वाढण्यासाठी घराच्या आसपास घरटी ठेवावीत असे आवाहन केले .एनसीसीएस चे भरत छेडा यांनी शास्त्रोक्त पद्धतीने घरटी बनविण्यासोबत त्याची निगा कशी राखावी आणि सुरक्षिततेचे उपाय याबद्दल माहिती दिली अध्यक्ष पांडुरंग दिड्डी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा कोटा यांनी केले तर युवराज मेटे यांनी आभार मानले .
एनसीसीएस च्या सदस्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून विद्यार्थीनीनी दोन हजार घरटी तयार केली . त्यांची ‘चिमणी वाचवा ‘ अक्षरात मोठया आकारात मांडणी केली . या चिमण्यांनो परत फिरा रे आपल्या घरचा एक कोपरा चिऊताईसाठी,चारा पाणी ठेऊन जिव्हाळा दाखवू यासारखे संदेश असलेले फलक मान्यवरांच्या हस्ते फुग्यांसाह आकाशात सोडण्यात आले .यावेळी मुलींनी एकच जल्लोष केला . कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.



