जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून साहित्याची जमवाजमव; समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती
पंढरपूर- आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर वारकरी-भाविकांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. चंद्रभागा नदीपात्रासह शहरातील गर्दीच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अग्निशमन वाहने, रेस्क्यू बोटी आणि बचाव साहित्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव करण्यात आली आहे.
आपत्कालीन व्यवस्थेकरिता ६ अग्निशमन वाहने आणि १ रेस्क्यू व्हॅन तैनात करण्यात आले असून याचे प्रभारी म्हणून पंढरपूर नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी संभाजी कारले (संपर्क: 9028111318) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रभागा नदीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या होड्यांसाठी १०४५ लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचे समन्वयक म्हणून जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता जेडे (संपर्क: 7972953824) काम पाहत आहेत.
बचावकार्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ११, पुणे जिल्ह्यातील २ आणि NDRF च्या ४ अशा एकूण १७ रेस्क्यू बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. रेस्क्यू बोटींसाठी १०० लाईफ जॅकेट, ३० लाईफ रिंग, बचाव पथकांच्या समन्वयासाठी ९ वॉकी-टॉकी, ५ मेगाफोन, ४ इन्फ्लेटेबल टेंट, ६ मि.मी. स्टॅटिक रेस्क्यू रोप, ५ टॉर्च, २ लेजर पॉइंटर आणि २ लाईट बॅटन यांचा समावेश आहे. या संपूर्ण साहित्याचे प्रभारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. शक्तीसागर ढोले (संपर्क: 9822515601) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आषाढी यात्रा कालावधीत सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर राहणार असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व साहित्य व मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आले आहे, अशी माहिती इन्सिडेंट कमांडर तथा अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली आहे.










