आषाढी वारी २०२६ च्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषदेचे संपूर्ण प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. जिल्हा परिषदेचे प्रमुख पदाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज पालखी मार्ग, मुक्काम तळे आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणांचा पाहणी दौरा केला.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांच्या उपस्थितीततसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मार्ग, मुक्काम तळे आणि रिंगण स्थळांची संयुक्त पाहणी करण्यात आली.तसेच शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार आणि महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती अमृता वाघे यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून तयारीचा आढावा घेतला.
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपूरवाड , कार्यकारी अभियंता बांधकाम एस व्ही कुलकर्णी,माळशिरस चे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे जिल्हा परिषद सदस्य धनाजी जाधव यांच्यासह सर्व खात्यांचे विभाग प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
धर्मपुरी ते वाखरी पालखी तळ आणि रिंगण सोहळा स्थळांची सूक्ष्म पाहणी सकाळी ठीक ९.०० वाजता माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथून याद्वारे सुरुवात झाली झाला. धर्मपुरी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा तळ, पुरदावडे आणि खुडूस येथील प्रसिद्ध गोल रिंगण सोहळा स्थळ तसेच पुरदावडे प्राथमिक आरोग्य केंद्राची सविस्तर पाहणी करण्यात आली. वेळापूर येथील पालखी मुक्काम तळावर वारकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक जर्मन हँगर शौचालय आणि स्नानगृहांची तपासणी करून तेथील कामाचा दर्जा तपासण्यात आला.
बोंडले, बोरगाव व पिराची कुरोली:बोंडले येथील श्री चांगा वटेश्वर महाराज पालखी मुक्काम तळ, तसेच बोरगाव व पिराची कुरोली येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी तळाची पाहणी करण्यात आली.
वारी काळात लाखो भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून उभारण्यात आलेल्या पाणी टँकर फीडिंग पॉईंट्सची प्रत्यक्ष पाहणी करून पाणी वितरणाचे नियोजन समजून घेण्यात आले.
भंडीशेगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपान काका महाराज पालखी तळ आणि पंढरपूर जवळील वाखरी येथील भव्य गोल रिंगण सोहळा स्थळाची पाहणी करून तयारीचा अंतिम आढावा घेण्यात आला.
केवळ भौतिक सुविधांवरच भर न देता, या वारीला ‘पर्यावरणपूरक वारी’चे रूप देण्यासाठी जिल्हा परिषदेने पावले उचलली आहेत. या दौऱ्यादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्व प्रमुख पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या हस्ते विविध पालखी तळांवर वृक्षारोपण करण्यात आले. वारीच्या निमित्ताने संपूर्ण पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर झाडे लावून त्यांचे जतन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
नियोजनबद्ध दौऱ्यामुळे पालखी मार्गावरील सोयी-सुविधांच्या कामांना मोठी गती मिळाली असून, ‘पाऊले चालती पंढरीची’ म्हणत येणाऱ्या लाखो वैष्णवांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषद आता पूर्णपणे सज्ज झाली आहे.














