सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे गाळप सुरू होऊन महिनाभरांचा कालावधी लोटला तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी साखर कारखान्यांना ऊस दर जाहीर करा असे वारंवार सांगितले तरीही जिल्ह्यातील मुजोर साखर कारखानदार याला जुमानायला तयार नाहीत. ऊसाला किमान तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी या मागणीसाठी आता शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध साखर कारखाना स्थळावर उग्र आणि आक्रमक पद्धतीचे आंदोलन सुरू झाले आहे. रविवारी दिवसभर आंदोलन करून शेतकऱ्यांनी बीबीदारफळ येथील लोकमंगल शुगर्स तसेच जकराय शुगर यांचे गाळप बंद पाडले. लोकमंगल कारखाना स्थळावर रात्रभर भजन करून स्वखर्चाने आंदोलनकर्त्यांनी जेवणावळीचा कार्यक्रम केला. पंढरपूर मोहोळ मंगळवेढा या तालुक्यातील साखर कारखाना स्थळावर देखील आंदोलन पेटले आहे. आंदोलन कर्त्यांना माजी खासदार माजी खासदार राजू शेट्टी यांनी बळ दिल्यामुळे हे आंदोलन अधिक आक्रमक होऊ लागले आहे. काही कारखान्यांनी गेल्या वर्षीची देखील एफ आर पी ची रक्कम दिली नाही. ऊस गाळप झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजे असा एफ आर पी चा कायदा सांगतो मात्र जिल्ह्यातील बहुतांश कारखानदार हा कायदा पायदळी तुडवतात. मुख्यमंत्र्यांपासून साखर आयुक्तांपर्यंत सर्वजण या साखर सम्राटांच्या पाठीशी असल्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी FRP कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आंदोलन करावे लागते हे दुर्दैव.

