सोलापूरकरांचे हाल बेहाल…
रस्त्याच्या नावाखाली सोलापूरकरांचे हाल सुरू झाले असून आता किमान महिनाभर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे.
प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सोलापूरकरांना नाहक त्रास सोसावा लागणार आहे. सोलापुरातील दोन मोठे रस्त्यांचे एकाच वेळी दुरुस्ती करण्यात आल्याने नियोजना अभावी सोलापूरकरांची कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दृश्य काल दिसले.आता हे दृश्य महिनाभर असेच दिसणार आहे.
विजापूर रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या पुलाच्या अचानक सुरू झालेल्या कामामुळे सोलापुरातील डी मार्ट चौक ते महावीर चौक हा रस्ता अत्यंत कोंडीचा बनलेला आहे. आसरा पुलाचे नऊ महिन्यात केवळ दहा टक्केच काम झाल्याने मनपाच्या गलथानपणाच्या चुकीची शिक्षा सोलापूरकरांना भोगावे लागत आहे.
हे काम रेल्वे अधिकारी आणि पालिका अधिकारी यांच्या वादामुळे अपूर्ण राहिले आहे. आसरा चौकातून सुरळीत वाहतूक व्हावी यासाठी पोलीस बंदोबस्त नव्हते.वाहतुकीचे नियोजन झाले नव्हते. होटगी रोडवरील चेतन फाऊंंड्रीच्या समोरून गैबीपीर झोपडपट्टी मार्गे जुळे सोलापुरात जाण्यासाठी नवा उड्डाणपूल हवा या मागणी आजही दुर्लक्षितच राहिली आहे.
या मार्गावरील विद्युत खांब, डीपी हटवण्याकडे महावितरणाचे दुर्लक्ष झाले आहे.शहरातून विजापूर रोड ला जाण्यासाठी केवळ एकच उड्डाणपूल असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. एकंदरीत सोलापूर महानगरपालिका, रेल्वे प्रशासन आणि महावितरणांमध्ये समन्वयाचा अत्यंत अभाव असल्याचे दिसून आले.

