पुणे : बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने त्याचा परिणाम राज्यावरही होणार आहे.१६ ऑगस्टपासून राज्यात बहुतांश भागात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जुलै महिन्यामध्ये कोकण विभाग व पश्चिाम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर विक्रमी पावासाची नोंद झाली. या भागांत काही ठिकाणी अद्यापही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये पावसाने दीर्घ ओढ दिली आहे. दोन आठवड्यांपासून अधिक काळापर्यंत पाऊस पडला नाही. खरिपाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दोन ते तीन दिवसांत या भागातही पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.
तापमानवाढ कायम
पावसाने ओढ दिलेल्या भागांत तापमानवाढ कायम असल्याने उन्हाचा चटका वाढलेला आहे. राज्यात बहुतांश भागांत दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे गेला आहे.