सोलापूर ; अटल भूजल योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गावातील पिण्याच्या पाण्याची , जनावरासाठी, शेतीसाठी पाण्याची गरज ओळखून पाण्याचा ताळेबंद करणे आवश्यक आहे.त्यासाठी पिकपद्धतीचा बदल करणे ,पाण्याचा अतिवापर व अतिउपसा कमी करणेसाठी जनजागृती अतिशय प्रभावीपणे करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भूजल विकास यंत्रणेचे संचालक डाॕ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये अटल भूजल योजनेच्या आढावा बैठकीमध्ये संचालक डाॕ.मल्लिनाथ कलशेट्टी हे बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जून गुंडे ,उपजिल्हाधिकारी गुरव , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) चंचल पाटील, जिल्हा कृषी अधिक्षक रविंद्र माने आदी उपस्थित होते.यावेळी संचालक डॉ.कलशेट्टी पुढे म्हणाले ,अटल भूजल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मोहोळ, माढा,माळशिरस, पढरपूर असे चार तालुक्यात एकूण ११५ ग्रामपंचायत आहेत.यापूर्वी जलयुक्त शिवार अंतर्गत उत्कृष्ट कामे झालेली आहेत.त्याआधारे अटल भूजल योजनेत कामे चांगल्या पद्धतीने होणे अपेक्षित आहेत.त्यासाठी शिवारफेरी व सामाजिक सर्वेक्षण करणे गरजेचे आहे आणि अधिकारी व कर्मचारी यांनी गावात मुक्काम करुन सदर योजनेस नक्की गती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी भूजल विकास यंत्रणेने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेऊन प्रगती करण्याबाबत मार्गदर्शन केले.तसेच भूजल विकास यंत्रणा व सामाजिक संस्था यांनी नियोजन करुन मोहोळ तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीमधील काम पूर्ण करण्याची सुचनाही करण्यात आली.यावेळी भूजल विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख यांनी प्रास्तविकामध्ये अटल भूजल योजनेचे उद्दिष्ट , कामाचे स्वरूप ,आजतागायत झालेल्या कामाचे प्रगती याबाबत माहिती सांगितली.दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये कोवीड १९ जनजागृतीबाबत पुणे विभागाचे समन्वयक डॉ.कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले.