शासनाने डिसेंबर 2025 पासून मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागातील शेत पानंद रस्त्याच्या मजबुती करण्यासाठी पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या साह्याने जलद गतीने कामे करण्यासाठी ही योजना आणली असून प्रती किलोमीटरसाठी 15 लाख रुपये खर्च या योजनेअंतर्गत करता येतो. शासनाने 23 जून 2026 रोजी या योजनेअंतर्गत काढलेल्या जीआर नुसार सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि पंढरपूर साठी प्रत्येकी साडेसात कोटी रुपये तर दक्षिण सोलापूर साठी पाच कोटी आणि करमाळा,माढा,बार्शी, मोहोळ, सांगोला,माळशिरस या प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी प्रत्येकी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्याला 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे सोलापूर शहर उत्तर मतदार संघात ग्रामीण भागाचा समावेश असताना एक रुपयाचा देखील निधी या योजनेतून दिला नाही तसेच सोलापूर शहर मध्य हा शहरी भाग असल्यामुळे या योजनेत हा मतदारसंघ घेतला नाही. मात्र पंढरपूर आणि अक्कलकोट या विधानसभा मतदारसंघाला प्रत्येकी साडेसात कोटी रुपये कोणत्या निकषाच्या आधारावर दिले याचे कोडे आमदारांना पडले आहेत.









