नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीला अत्यंत महत्त्व आहे. देशाचा आर्थिक विकास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने विविध योजना आणल्या आहेत. आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्म किसान सारथी हा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांना पीक आणि त्यासंदर्भातील विविध माहिती देण्यात येईल. या प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये माहिती मिळवता येईल. शिवाय या प्लॅटफॉर्मच्या मदतीने शेतकऱ्यांनी त्यांचं पीक आणि भाज्या यांची विक्रीही करता येईल.
कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकत्रितपणे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे किसान सारथी लाँच केलं आहे. यावेळी वैष्णव यांनी असे म्हटले की, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकरी थेट वैज्ञानिकांकडून शेती आणि त्यासंबंधित क्षेत्राबाबत वैयक्तिक सल्लामसलत करू शकतात. त्यांनी पुढे असे म्हटले की, शेतकऱ्यांच्या पीकांना त्यांच्या शेतापासून थेट गोदाम, बाजार आणि ज्या ठिकाणी त्यांना कमी तोट्याने विकायचे आहे अशा ठिकाणी पोचविण्याच्या क्षेत्रात नवीन तांत्रिक हस्तक्षेपावर संशोधन केले पाहिजे.किसान सारथीच्या साहाय्याने शेतकऱ्यांना चांगले पीक, योग्य प्रमाणात उत्पादन आणि इतर अनेक मूलभूत गोष्टींची माहिती मिळू शकेल. शेतकरी पिकाशी संबंधित कोणतीही माहिती थेट वैज्ञानिकांकडून डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे घेऊ शकतात. तसेच, आपण शेतीच्या नवीन पद्धती शिकू शकता.









