महापौर पदाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या महापौर पदाच्या पहिल्या दिवसाच्या कामाची सुरुवात आज त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर उद्यान येथे भेट देऊन केली. यावेळी उद्यान परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.महापौरांनी यावेळी उद्यानात उपस्थित असलेल्या मॉर्निंग ग्रुपच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. नागरिकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा व गती याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.याचप्रसंगी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.




माता रमाई आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा व त्यागाचा आदर्श पुढील पिढीस प्रेरणादायी असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले.यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक सत्यजित वाघमोडे,अजित गायकवाड तसेच कामगार नेते जानराव आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आज माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माता रमाई आंबेडकर यांच्या सामाजिक योगदानास अभिवादन केले.यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याचे काम सुरू असून, सदर कामाची महापौरांनी पाहणी केली. पुतळा परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण तसेच कामाचा दर्जा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.




तसेच उद्यानात नागरिकांसाठी सार्वजनिक स्वच्छालयाची आवश्यकता असल्याने त्या ठिकाणचीही पाहणी करण्यात आली. नागरिकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने लवकरात लवकर स्वच्छालय उभारणीबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.यावेळी बोलताना महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठिकाण असून येथे येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्यामुळे या उद्यानाचे सामाजिक महत्त्व अधिक वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.

