नवी दिल्ली : नारायण राणे याच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राणे यांनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का असं विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, “नाही त्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांचे मन इतके मोठे नाही. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो”. दरम्यान शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली.“संजय राऊत यांना काही ना काहीतरी बोलायचंच असते . चांगले नाही वाईटच बोलायचे असते . राऊत यांना सांगेन खाते बरे वाईट नसते , तर काम कसे करतो हे महत्वाचे असते . या खात्याला मी जेव्हा न्याय देईन तेव्हा राऊतच हे खाते चांगलं आणि मोठे होते असे म्हणतील,” असा टोला राणे यांनी लगावला.










