राज्यातील ओबीसी राजकारण पुन्हा पेट घेण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला स्वतःला बोलावले गेले नाही, या कारणावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके संतप्त झाले असून त्यांनी आज जेजुरीमधून आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसींच्या अस्तित्वाचा, सन्मानाचा आणि अधिकाराचा प्रश्न आता टोकाला गेला आहे, असे ठणकावून सांगत हाके यांनी जेजुरी गडावरून ओबीसींच्या नव्या लढ्याची तळी उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्यभरातील समाजबांधवांना त्यांनी जेजुरी गडावर या, लढा एकत्र सुरू करूया असे भावनिक आवाहन केले आहे.
मुंबईत नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक झाली. मात्र, या बैठकीला लक्ष्मण हाके यांना आमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे ओबीसी समाजातील अनेक गटांमध्ये नाराजी पसरली आहे. हाके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, ज्या समाजासाठी आपण रस्त्यावर झटतो, त्याच समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत आमचं नाव घ्यायचंही धाडस सरकार करत नाही. हीच खरी जातीय अन्यायाची व्याख्या आहे. त्यामुळे त्यांनी आज जेजुरीतून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. राज्यातील विविध जिल्ह्यांतून ओबीसी तरुण, महिला आणि समाज नेते जेजुरी गडावर दाखल होत असून, या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता आहे.
जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा जातीवादी सल्ले घेऊ नका
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. सरकारने जातीवादी सल्लागारांचं ऐकू नये, अन्यथा परिणाम गंभीर होतील, असे जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, सर्व समाजांना न्याय द्या, पण एका समाजाच्या दबावाखाली अन्य समाजाचे हक्क हिरावून घेऊ नका. जरांगे यांच्या या वक्तव्याने ओबीसी नेत्यांमध्ये संभ्रम आणि संताप दोन्ही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरक्षणाचे समीकरण आणखी गुंतागुंतीचे झाले असून, पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
OBC नेत्यांची बैठक निष्फळ; 10 ऑक्टोबरच्या मोर्चावर ठाम
मुंबईतील बैठकीत छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, बाळासाहेब थोरात यांसारख्या नेत्यांनी हजेरी लावली होती. परंतु बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. OBC नेत्यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत सांगितले की, मराठा समाजासाठी जारी करण्यात आलेला जीआर रद्द केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू. बैठकीतून समाधान न झाल्याने ओबीसी नेत्यांनी 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सकल ओबीसी समाज मोर्चात ठाम राहण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सरकारसमोर आता दोन आघाड्यांवर दबाव निर्माण झाला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आंदोलन करत आहेत, आणि दुसरीकडे ओबीसी समाजही स्वतःच्या हक्कासाठी पेटून उठण्याच्या तयारीत आहे.
आता ओबीसी एकत्र येणार
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे. परभणी, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतून समाजबांधवांनी जेजुरी गडावर चला असा नारा दिला आहे. अनेक युवक संघटनांनी हाके यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. सरकारने ओबीसींना चर्चेबाहेर ठेवून मोठी चूक केली, अशी टीका स्थानिक नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान, सरकार आता मध्यस्थीच्या प्रयत्नात असून, गृह विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, हाके यांच्या आंदोलनाला किती मोठा प्रतिसाद मिळतो आणि राज्य सरकारची भूमिका काय राहते, यावर पुढील घडामोडी अवलंबून राहणार आहेत.

