येस न्युज मराठी नेटवर्क । देशात असंख्य लोक अजूनही आरोग्य सेवांपासून कोसो दूर असल्याचं भीषण वास्तव नाकारता येत नाही. वेळीच उपचार न मिळाल्यानं मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पण, उपचारांच्या अभावापेक्षा गुणवत्ताहीन आरोग्य सेवेमुळेच अधिक मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहीर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून हे कटू सत्य समोर आलं आहे.
भारतात उपचारांची गुणवत्ता खराब असल्यानं मृत्यूची संख्या मोठी आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकारी रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त असून, त्यातून खासगी रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची गुणवत्ता खराब असल्याचंच दिसून येत असल्याचं अहवालात म्हणण्यात आलं आहे. खासगी रुग्णालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची गुणवत्ता नकारात्मक परिणाम घडवून आणू शकतात, असंही पाहणीत म्हटलं आहे.
बाळंतपणादरम्यान होणाऱ्या मृत्यूची संख्या सरकारी रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयामध्ये जास्त आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये बाळंतपणादरम्यान होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण ०.६ टक्के आहे, तर हेच प्रमाण खासगी रुग्णालयांमध्ये ३.८४ टक्के इतकं जास्त आहे. भारतातील आरोग्य सेवेवर खासगी रुग्णालयांचं वर्चस्व दिसून येतं. जवळपास ७४ टक्के ओपीडी सुविधा आणि ६५ टक्के रुग्णालयात दाखल उपचार करण्याच्या सेवा शहरी भागात खासगी रुग्णालयांकडून दिली जाते.