सोलापूर- 1 एप्रिल 21 रोजी तत्कालीन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेतून घरकाम करणाऱ्या महिला यांची नोंदणी व सामाजिक सुरक्षा व कल्याणासाठी “समर्पित कल्याण निधी” निर्माण करणे, त्यासाठी बीजभांडवल म्हणून २५० कोटी रुपये जाहीर केले आणि जमा होणा-या एकूण निधीतून घरकाम करणा-या महिलांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतील अशी घोषणा केली मात्र त्याची अद्यापही अंमल बजावणी सुरू झालेली नाही.वास्तविक पाहता मी आमदार असताना नागपूर च्या हिवाळी अधिवेशनात घरेलू कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापना करावे याकरीता तब्बल नऊ तास उपोषण करावे लागले, अखेर सरकारला कायदा करावा लागला. घरेलू कामगारांना किमान दरमहा 10 हजार वेतन व दिवाळी ला एक महिन्याचे सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे अन्यथा रास्तावरची लढाई अटळ असल्याचा ईशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी घरेलू कामगार सभेला संबोधित करताना दिला.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने रविवार दि 23 जुलै 2022 रोजी सिटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे पुरोगामी विचारवंत प्रा.अजित अभ्यंकर यांच्या उपस्थितीत घरेलू कामगारांची सभा पार पडली.
यावेळी आडम मास्तर पुढे म्हणाले की, केवळ योजना घोषित करून चालणार नाही त्याची अंमलबजावणी ही महत्त्वाची असते.आज जनश्री विमा योजना या सरकारने बंद केलेली आहे.यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व 58 वर्षांपुढील महिलांना सन्मानधन पासून वंचित राहावे लागत आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे यासाठी सरकारला धारेवर धारल्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन दिले.
यावेळी प्रा.अजित अभ्यंकर म्हणाले की, आज केंद्र सरकार कामगार व जनता विरोधी धोरणे राबवताना कामगारांनी रक्तरंजित क्रांती घडवून मिळवलेले कायदे पायदळी तुडवत आहेत असा आरोप केले.
यावेळी व्यासपीठावर नलिनी कलबुर्गी, वसंत पवार, रंगप्पा मरेड्डी,शंकर म्हेत्रे,मारेप्पा फांदीलोलु, सोमनाथ मरेड्डी,मिनाक्षीताई चलवादी, बजरंग गायकवाड दीपक निकंबे आदी उपस्थित होते.