शिक्षणाधिकारी वठारे : १८ भरारी व परीक्षा केंद्रावर बैठे पथक
सोलापूर : जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षेवेळी कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हास्तरी ७ तालुकास्तरीय ११ तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बैठे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती म ध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी दिली.
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या काळात तर दहावीच्या परीक्षा २ ते २५ मार्च या काळात होणार आहेत. बारावीसाठी ११४ परीक्षा केंद्र असून ५३ हजार ५८४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी १७६ केंद्र असून ६४ हजार ४२४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दोन्ही परीक्षामध्ये कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी केंद्र संचालकांची बैठक घेउन सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेचे संचालन सुयोग्य व केंद्रावर गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व दोन्ही शिक्षणाधिकारी असणार आहेत. जिल्हास्तरावर ७ तर तालुकास्तरावर ११ भरारी पथके कार्यरत आहेत.
जमावबंदीचा आदेश
परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरच्या आत परीक्षार्थी शिवाय इतरांना प्रवेश निषिद्ध आहे. यासाठी परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. परीक्षा केंद्राभोवती गर्दी जमत असेल तर संबंधीत अधिकारी कलम १४४ अन्वये जमावबंदीचा आदेश लागू करतील. एकाच ब्लॉकमध्ये पाच जण कॉपी करताना आढळल्यास पर्यवेक्षकास जबाबदार धरून केंद्र संचालक कारवाई करतील. याशिवाय कॉपी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी वठारे यांनी सांगितले.
मोबाईल, लॅपटॉपला बंदी
परीक्षार्थीला सोबत मोबाईल, लॅपटॉप नेहण्यास बंदी आहे.तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद राहणार आहेत..
प्रश्नपत्रिकेचे सीलबंद पाकिट परीक्षा हॉलमध्येच उघडले जाईल.व त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहेत..