मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील विधान परिषदेच्या 12 जागा नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना राज्यपालांवर टिका केली आहे. ‘हा सगळा खेळ ठरवून चाललेला आहे. राज्यपाल स्वतःच्या मर्जीने हे सर्व करत नाहीत. त्यांच्यावर दबाव आहे, तो दबाव कोठून असू शकतो हे आपल्याला माहिती आहे.’ राज्यपालांनी राजकारणातील प्यादे बनू नये असा सल्लाही राऊत यांनी राज्यपालांना दिला आहे.
12 आमदारांबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका ही राजकीय आहे. महाराष्ट्रामध्ये देखील 12 आमदारांवर जी राजकीय बंदी घातलेली आहे ती राज्यपालांनी उठवावी असेही राऊत यावेळी म्हणाले.यावेळी राऊत यांना शिवसेनेची युपीएबाबत असलेली भूमिकेबद्दल विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीला अजून खूप वेळ आहे. आताच कशाला भूमिका स्पष्ट करायला हवी, भूमिका स्पष्ट करण्याचे कारण काय?” अनेक पक्ष असे आहेत, जे कुठेच नाहीत, पण ते भारतीय जनता पक्षाबरोबरही नाहीत. ते कुठेना कुठे तरी वेगळ्या पक्षाबरोबर आघाडी आहेत. आणि त्यांनी त्या राज्याचे सरकार चालविण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे, असे राऊत यावेळी म्हणाले.