खासदारकी तसेच आमदारकीच्या निवडणुका या नेत्यांच्या असतात. त्यासाठी कार्यकर्ते राब राबतात. आपल्याला तिकीट मिळेल म्हणून आमदार- खासदारांच्या पाया पडणं असतो किंवा त्यांच्या सतरंज्या उचलायचा असो.. कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतात. आता नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका जाहीर होतील. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका समजल्या जातात. यासाठी नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देणे अपेक्षित असते. मात्र आता महायुती किंवा महाआघाडी होणार नसून जो तो पक्ष आपल्या मित्र पक्षाच्या विरोधात लढणार असेच दिसते.
महायुती म्हणून निवडणुका लढवायच्या का याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जो तो स्वबळाची भाषा करतोय. त्यामुळे अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट अस्वस्थ आहे. अशीच अवस्था शरद पवार गट काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेत आहे. त्यामुळे आपला आमदार आपला खासदार निवडून यावा यासाठी एकमेकांच्या विरोधात भांडण करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी आता पुन्हा युती किंवा आघाडी न करता कार्यकर्त्यांमध्ये कुस्त्या लावून तमाशा बघण्याचा उद्योग सर्वच राजकीय पक्ष करणार असे दिसते. त्यामुळे प्रत्येक पक्षाची ताकद किती हे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर दिसेल.

