लातूर : राज्यातील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या ‘लातूर पॅटर्न’चे जनक, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील (वय 94) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि राजकारण अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘देवमाणूस’ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “डॉ. पाटील यांनी शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. लातूर पॅटर्नमुळे हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार केले. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील.”
३ ऑक्टोबर १९३१ रोजी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा येथे जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी ओस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएस आणि डीसीएच पदवी मिळवली. बालरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी लातूरमध्ये दीर्घकाळ सेवा दिली. १९६५ पासून त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू करत अनेक वर्षे विनामूल्य सेवा देऊन समाजात वेगळे स्थान निर्माण केले.
शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लातूरमध्ये शिक्षणाची मजबूत पायाभरणी केली, ज्यातून पुढे ‘लातूर पॅटर्न’ उदयास आला. या पद्धतीमुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले.
राजकीय क्षेत्रातही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. १९९१ ते १९९९ या काळात त्यांनी चार वेळा लोकसभा निवडणूक लढवली तसेच १९९४ ते २००० दरम्यान राज्यसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले. संसदीय समित्यांवरही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या.
डॉ. पाटील यांच्या पश्चात पत्नी शांताबाई पाटील, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. आज सायंकाळी ५ वाजता लातूरमधील संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजसेवा आणि राजकारणातील एक प्रेरणादायी अध्याय संपला आहे. मात्र ‘लातूर पॅटर्न’च्या रूपाने त्यांचे कार्य कायम जिवंत राहील.

