सोलापूर- डीएपीच्या उपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर एसएसपी, टीएसपी व संयुक्त खतांचा वापर फायदेशीर
राज्यात खरीप हंगामास सुरुवात होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी केवळ डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खतावर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्यामध्ये मागील तीन वर्षांत खरीप हंगामात सुमारे ४४ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते आणि एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य मृदा परीक्षण व जमिनीच्या आरोग्य पत्रिकांच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करणाऱ्या अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे. खरीप हंगामात डीएपी खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. डीएपी खतामध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद हे अन्नद्रव्य असते. मात्र, राज्यात डीएपीचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने पर्यायी खतांचा वापर करणे आवश्यक ठरत आहे.
स्फुरदयुक्त खतांमध्ये डीएपीनंतर एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) खताला विशेष महत्त्व आहे. हे खत देशांतर्गत तयार होत असून त्यामध्ये १६ टक्के स्फुरदासोबत सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्येही असतात. विशेषतः तेलबिया पिकांसाठी सल्फरयुक्त एसएसपी खताचा वापर लाभदायक ठरतो. डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन गोण्या एसएसपी खतांचा वापर हा प्रभावी पर्याय ठरू शकतो.
याशिवाय एनपीके १०:२६:२६, एनपीके २०:२०:०:१३, एनपीके १२:३२:१६, युरिया-एसएसपी कॉम्प्लेक्स आणि एनपीके १५:१५:१५ यांसारख्या संयुक्त खतांच्या वापरामुळे नत्र, स्फुरद आणि पालाश ही महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. त्यामुळे या खतांचा वापर पिकांच्या संतुलित पोषणासाठी उपयुक्त ठरतो.
तसेच टीएसपी (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खतामध्ये ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्य असते. डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि एक गोणी टीएसपी खतांचा वापर केल्यास तोही डीएपीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी उपलब्धतेनुसार एसएसपी, टीएसपी आणि विविध संयुक्त खतांचा वापर करून संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.










