तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवर चीनकडून तब्बल ₹14 लाख कोटींचा महाकाय जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे. ‘शतकातील प्रकल्प’ म्हणून चीनकडून या प्रकल्पाचा उल्लेख केला जात आहे.
तिबेटच्या भूकंपप्रवण भागात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात पाच जलविद्युत केंद्रांचा समावेश असून, यासाठी सुमारे 1.2 ट्रिलियन युआन म्हणजेच जवळपास ₹14 लाख कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे.
ब्रह्मपुत्रा नदी भारतात अरुणाचल प्रदेश आणि आसाममधून वाहत असल्याने या प्रकल्पाच्या परिणामांबाबत भारताची चिंता वाढली आहे. धरणामुळे पाण्याचा प्रवाह, साठवणूक आणि भविष्यातील पूरस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, तिबेट-चीन सीमेवरील हिमनद कोसळणे आणि नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवरही चीनचा हा महाकाय प्रकल्प थांबण्याची शक्यता कमी असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
धरणामुळे भारताच्या ईशान्य भागातील पाण्याच्या प्रवाहावर नेमका काय परिणाम होणार, याबाबत मात्र अद्याप पुरेशी माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या पर्यावरणीय आणि सुरक्षाविषयक परिणामांबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.










