मुंबई – राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि बोगस मतदारांची नावे असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. या गंभीर त्रुटींविरोधात आवाज उठवण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने नुकतीच निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीत विरोधकांनी मतदारयाद्यांमधील त्रुटी आयोगासमोर मांडल्या. मात्र, आपले समाधान झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्रात 96 लाख बोगस मतदार असल्याचा मोठा दावा केला. यानंतर सर्वपक्षीय विरोधकांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत निवडणूक आयोगाविरोधात मुंबई मोर्चा काढणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली.
आयोगाच्या घोटाळ्यांबाबत लढाई सुरू
संजय राऊत म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांबाबत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष एक लढाई लढत आहेत. ही लढाई राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्लीत लढतोय. त्यानंतर आता महाराष्ट्रात ही लढाई सुरू झालेली आहे. या लढाईतून काय निष्पन्न होईल याविषयी शंका आहे.
शहांनी आधी महाराष्ट्रातील घुसखोर बाहेर काढावेत
आजच राज ठाकरे यांनी दोन मुद्दे मांडले. मतदार करा किंवा करू नका, निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झालेले आहे. या मॅच फिक्सिंगविरुद्ध आपली लढाई आहे. महाराष्ट्राच्या यादीत 96 लाख बोगस मतदार आजही आहेत. हे मतदार मतदार आमच्या दृष्टीने घुसखोरच आहेत. या घुसखोरांना यादीतून बाहेर काढणे ही लोकशाहीची गरज आहे. कालच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावे मतदार यादीतून बाहेर काढू, असे सांगितले. त्यामुळे अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत घुसलेले एक कोटी मतदारांना आधी बाहेर काढावे आणि त्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रापासून सुरुवात करावी, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

