येस न्युज नेटवर्क : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार आज पार पडला. यामध्ये 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही अपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद देतो म्हणून मला शब्द दिला होता, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
मंत्रीमंडळ विस्तारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘नाराज आहे असा विषय नाही, प्रत्येकाला वाटतं मी मंत्री बनले पाहिजे. मला मंत्रिपदासाठी थांबवले म्हणजे कायमचं थांबवलं नाही, काही दिवसासाठी थांबवलं आहे… एकत्र राहायचं म्हणजे समजून घ्यावे लागणार.’
विस्तार होईल तेव्हा मंत्रीपद मिळेल
काही अडचणी वरिष्ठांना असतील तर आपण समजदारी घेतली पाहिजे. मला शब्द दिला होता, ते करतो म्हणले होते… मंत्रीपद देतो म्हणून हा शब्द मला दिला होता. हा शब्द जरी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पाळला गेला नाही तरी मला विश्वास आहे दुसऱ्या वेळेस जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा मंत्रीपद मिळेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय.











