उजनी धरणातून भीमा नदीत आज सायंकाळी चार वाजल्यापासून 80 हजार क्युसेक एवढे या हंगामातील सर्वाधिक पाणी सोडले आहेत. तसेच वीर धरणातून नीरा नदी पात्रात हा सायंकाळी चार वाजल्यापासून 63 हजार 300 क्युसेक एवढे पाणी सोडले आहे. उजनीतून सोडलेले पाणी उद्या दुपारपर्यंत तर नीरा नदीत सोडलेले पाणी रविवार पर्यंत पंढरीत येणार आहे. त्यामुळे पंढरपूरला महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. जुना दगडी पुलावर पाणी आल्यामुळे गेल्या सहा दिवसापासून वाहतुकीसाठी बंद आहे. भीमा आणि नीरा या नदीच्या संगम नीरा नरसिंगपूर या ठिकाणी होतो त्यामुळे पंढरपुरात भीमा नदी पात्रात एक लाख 25 हजार एवढा पाण्याचा प्रवाह झाल्यास पंढरपूर मंगळवेढा या मार्गावरील जुना गोपाळपूरचा पूल वाहतुकीसाठी बंद केला जातो. पंढरपुरात भीमा नदी पात्रात एक लाख साठ हजार क्युसिकचा पाण्याचा प्रवाह राहिल्यास पंढरपूर मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर येथे बांधलेला नवीन पूल देखील पाण्याखाली जातो. शिवाय पंढरपुरातील व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. वीस वर्षांपूर्वी म्हणजेच 2006 साली भीमा नदीला आजवरचा सर्वात मोठा पूर आला होता. त्यावेळी पाटबंधारे खात्याने भीमा नदीच्या दुतर्फा निळी रेषा निश्चित केली आहे. सध्या भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे भीमा नदीवर उजनी ते अक्कलकोट पर्यंत असलेले एकूण 22 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. भीमा नदी पात्रात पाण्याचा प्रवाह सुरू असेल तर वीर धरणातून नीरा नदीत सोडलेले पाणी पंढरपुरात दोन दिवसानंतर पोहोचते तर उजनीतून भीमा नदीत सोडलेले पाणी पंढरपुरात दीड दिवसात पोहोचते. याचे गणित घालून पाटबंधारे विभागाकडून पूर नियंत्रण केले जाते. त्यामुळे जरी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले असले तरीही भीमा नदीला महापूर येईल मात्र एवढा धोका होणार नाही असे पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात.









