भारतात लवकरच राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुलीची पद्धत आणखी आधुनिक होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, फेब्रुवारीपासून राष्ट्रीय महामार्गांवर बॅरियर-फ्री टोलिंग सुरू करण्यात येईल. त्यामुळे वाहनचालकांना टोल भरण्यासाठी टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही.
उपक्रमाविषयी माहिती देताना गडकरी म्हणाले की, एआय आणि सीमलेस टोल प्रणालीच्या माध्यमातून भारत आता टोल नाक्यांवर थांबण्याची जुनी पद्धत बंद करून वाहनांना न थांबवता पुढे जाण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. भविष्यातील राष्ट्रीय महामार्ग हे इंटेलिजेंट, बॅरियर-फ्री आणि १०० टक्के कॅशलेस असतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यामध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन आणि फास्टॅग तंत्रज्ञान एकत्रित केले जाईल. हायस्पीड कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहनांची नंबर प्लेट आपोआप स्कॅन केली जाईल आणि संबंधित टोलचे पैसे थेट खात्यातून आपोआप कापले जातील. यामुळे वाहनांना टोल नाक्यावर थांबून रांगेत उभे राहण्याची कोणतीही गरज उरणार नाही आणि प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचेल.









