भाग २ – प्रत्येक वळणावर भेटणारा विठ्ठल
“सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनिया ॥”
— संत तुकाराम महाराज
पहिल्या दिवसाची परीक्षा विठुरायाच्या कृपेने पार पडली होती. शरीर थकलं होतं, पण मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे जाग आली, तेव्हा एकच भावना मनात होती—आज विठुरायाच्या भेटीचा दिवस!
सकाळी सहा वाजता उंब्रज येथून आम्ही पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालो. त्या दिवशी साधारण १५० ते १५५ किलोमीटर अंतर पार करायचे होते. संध्याकाळी सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला वेळेत पोहोचायचे असल्यामुळे आमचं नियोजन अतिशय काटेकोर होतं. ठरल्याप्रमाणे आम्हाला दुपारीच पंढरपूरमध्ये पोहोचायचं होतं.
सूर्य नुकताच उगवत होता. सकाळचा गार वारा अंगाला स्पर्श करत होता. पहिल्या दिवसाचा थकवा मागे पडला होता. आता प्रत्येक पेडल विठुरायाच्या दिशेने पडत होतं.
काही अंतर पार केल्यानंतर आम्ही भोसले सरांच्या सासरच्या गावात पोहोचलो.
तिथे जे अनुभवायला मिळालं, ते आयुष्यभर विसरणं अशक्य आहे.
गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या गजरात आमचं स्वागत केलं. लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या डोळ्यांतील कौतुक आणि टाळ्यांचा गजर पाहून क्षणभर आम्ही कोण आहोत, कुठून आलो आहोत, हेच विसरून गेलो.
त्यानंतर आम्ही भोसले सरांच्या घरी पोहोचलो.
वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे भजन, टाळ-मृदंग आणि विठ्ठलनामाच्या गजरात आमचं स्वागत करण्यात आलं.
त्या वातावरणात एक वेगळंच पावित्र्य होतं.
आमच्या सायकलींवर पाणी शिंपडून त्यांचाही सन्मान करण्यात आला. त्या क्षणी जाणवलं—या लोकांसाठी सायकल ही केवळ एक वस्तू नव्हती; ती विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या माऊलीची साथीदार होती.
त्यानंतर गरमागरम पोह्यांचा नाश्ता झाला.
प्रत्येक सायकलस्वाराचा शाल, श्रीफळ आणि भुईमुगाच्या शेंगांनी सत्कार करण्यात आला.
त्या क्षणी मनात एकच विचार आला…
औदार्य म्हणजे काय?
औदार्य म्हणजे आपल्या घरात आलेल्या प्रत्येक माणसाला देव मानून त्याचा सन्मान करणे.
औदार्य म्हणजे आपल्याकडे जे आहे ते आनंदाने दुसऱ्याला देणे.
औदार्य म्हणजे अपेक्षेशिवाय प्रेम वाटत राहणे.
आजच्या युगात अशा मनांचा शोध घ्यावा लागतो.
भोसले सरांच्या कुटुंबाने मात्र आम्हाला औदार्य हा शब्द नाही, तर जगण्याची पद्धत आहे, हे कृतीतून दाखवून दिलं.
पुढे दुपारच्या जेवणाची वेळ झाली.
आमच्यासाठी त्यांनी प्रेमाने शिदोरी बांधून दिली होती.
तब्बल दीडशे थालीपीठे…
त्यासोबत दही…
ठेचा…
चवळीची उसळ…
राजगिऱ्याचे लाडू…
शेंगदाण्याचे लाडू…
हा फक्त डबा नव्हता…
तो त्यांच्या प्रेमाचा प्रसाद होता.
आजच्या काळात स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ काढणं कठीण झालं आहे; पण त्यांनी तीस सायकलस्वारांसाठी एवढ्या प्रेमाने तयारी केली होती.
तेव्हा पुन्हा एकदा मनात आलं—
“देणाऱ्याने देत जावे…”
जेवणानंतर भोसले सर सतत एकच गोष्ट सांगत होते…
“आता काय… पन्नास किलोमीटरच राहिलेत… सहज होईल… काळजी करू नका…”
त्यांच्या त्या साध्या शब्दांतही आम्हाला ऊर्जा मिळत होती.
आणि मग सुरू झाला… विठ्ठलाचा सहवास…
दुपारचे ऊन चांगलेच वाढले होते.
एक छोटासा घाट उतरून आम्ही पुढे निघालो.
हळूहळू शरीर थकायला लागलं.
डोळ्यावर झोप यायला लागली.
क्षणभर तर सायकलची दिशा बदलते आहे, असं जाणवत होतं.
पण…
अचानक एखादा दुचाकीस्वार आमच्या बाजूला यायचा…
“काय माऊली… कुठून आलात?”
“रत्नागिरी…? अरे वा! आता जवळच आलंय… रस्ता मस्त आहे… सावकाश जा… विठ्ठल भेटणारच!”
हे चार शब्द…
आणि पुन्हा पायात ताकद यायची.
थोड्याच वेळाने पुन्हा दुसरा एखादा माणूस…
पुन्हा तेच प्रोत्साहन…
असं एकदा नाही…
दोनदा नाही…
तीन-चार वेळा घडलं.
मी मनात विचार करू लागलो…
हे योगायोग आहेत का?
की…
विठ्ठलच वेगवेगळ्या रूपात येऊन आम्हाला धीर देतो आहे?
थोड्या वेळाने आम्ही पाणी प्यायला थांबलो.
तेथे काही लहान मुलं सायकलीभोवती जमा झाली.
“दादा… ही सायकल कितीची?”
“एवढं लांब आलात?”
“खूप भारी!”
त्यांच्या चेहऱ्यावरचं कौतुक पाहून पुन्हा एकदा थकवा नाहीसा झाला.
तेव्हा माझ्या मनात एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली…
विठ्ठल हा फक्त मंदिरात नसतो.
तो…
एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या प्रोत्साहनाच्या शब्दांत असतो.
लहान मुलांच्या निरागस हास्यात असतो.
सहप्रवाशांच्या विश्वासात असतो.
आणि…
आपल्या थकलेल्या मनाला पुन्हा उभारी देणाऱ्या प्रत्येक क्षणात असतो.
त्या दिवशी मला तीन-चार वेळा विठ्ठलाची अशी अनुभूती आली.
शरीर काही वेळा साथ सोडत होतं…
पण प्रत्येक वेळी…
Plan B… म्हणजे विठोबा…
तो धावत आला.
पंढरीत प्रवेश…
दुपारी साधारण साडेचार वाजता आम्ही पंढरपूरमध्ये प्रवेश केला.
त्या क्षणी अंगावर रोमांच उभे राहिले.
दोन दिवस ज्या विठ्ठलाचं नाव घेत होतो…
ज्यासाठी प्रत्येक पेडल मारलं…
ज्याच्यावर विश्वास ठेवला…
त्याच्या नगरीत आम्ही प्रवेश करत होतो.
त्या क्षणी संत तुकाराम महाराजांचा अभंग मनात दाटून आला—
“आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदचि अंग आनंदाचे ॥”
आणखी एक अभंग नकळत ओठांवर आला—
“सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनिया ॥
तुळशीहार गळा, कांसे पितांबर ।
आवडे निरंतर तेचि रूप ॥”
तो विठ्ठल प्रत्यक्ष समोर उभा होता की माझ्या मनात, हेच समजेनासं झालं.
दोन दिवसांचा प्रवास एका क्षणात डोळ्यांसमोरून सरकला.
पहिल्या दिवसाचा संघर्ष…
प्रसाद दादांचा “Plan A आणि Plan B”…
सहप्रवाशांची साथ…
भोसले कुटुंबाचं औदार्य…
वाटेत भेटलेली माणसं…
लहान मुलांचं कौतुक…
आणि प्रत्येक वळणावर भेटलेला विठ्ठल…
तेव्हा एक गोष्ट मनात कायमची कोरली गेली—
वारी म्हणजे फक्त पंढरपूर गाठणं नाही…
वारी म्हणजे स्वतःला गाठणं आहे.
या वारीने मला शिकवलं—
जिद्द म्हणजे काय…
मैत्री म्हणजे काय…
औदार्य म्हणजे काय…
श्रद्धा म्हणजे काय…
आणि सर्वांत महत्त्वाचं…
विठ्ठल हा मंदिरात उभा असलेला देव नाही; तो आपल्या मदतीला धावून येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या रूपात आपल्या सोबत चालत असतो.
यंदा मी पहिल्यांदा पंढरपूरला गेलो…
पण परतताना असं वाटलं—
विठ्ठलाला भेटून आलो नाही… तर विठ्ठलाला सोबत घेऊन परत आलो.
॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाराम ॥ 🙏🚴🧡
अमित जोशी
मुख्याध्यापक , जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा काटवण, देवगड














