आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई ; पंढरपुरात ६८ आस्थापनांची तपासणी, १०५ नमुने घेतले
पंढरपूर- आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने आज दि. ८ जुलै २०२६ रोजी शहरात धडक तपासणी मोहीम राबविली.
या मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी, प्रसाद विक्रेते अशा ६८ आस्थापनांची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे १०५ नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

वारी काळात विशेष दक्षता
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात देशभरातून लाखो वारकरी दाखल होत असतात. या काळात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. अन्नपदार्थ साठवणूक, स्वच्छता, वापरले जाणारे तेल, रंग व इतर घटकांची गुणवत्ता याबाबत काटेकोर तपासणी करण्यात आली.
निकृष्ट आढळल्यास कारवाई
नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास संबंधित आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच सर्व व्यावसायिकांनी स्वच्छता, गुणवत्ता व नियमांचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी केले आहे.
वारी कालावधीत अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.










