सोलापूर – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून वृक्षलागवड ही केवळ औपचारिकता नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याची जबाबदारी असल्याचे मत यावेळी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर पुढाकार घेऊन वृक्षलागवड व त्यांचे संगोपन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

कुलगुरू डॉ. महानवर यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठ परिसरात पाच लाख वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला असून त्या दिशेने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या संकल्पाअंतर्गत आतापर्यंत एक लाख ६८ हजार वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली असून त्यांच्या संवर्धनावरही विशेष भर दिला जात आहे. वृक्षलागवडीनंतर त्यांचे संगोपन, संरक्षण आणि वाढ यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहे.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, अभियांत्रिकी विभाग तसेच विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि पर्यावरणप्रेमींच्या सहकार्याने विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून विद्यापीठ परिसर अधिकाधिक हिरवागार आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कार्यक्रमाचे नियोजन पर्यावरणशास्त्र विभागाचे संचालक डॉ. विनायक धुळप यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड ही प्रभावी लोकचळवळ बनली पाहिजे, असे मत व्यक्त करत सर्वांनी हरित अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून विद्यापीठाच्या हरित विकासाच्या ध्येयाला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.











