पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज देसातील पायाभूत सुविधांना गती देणाऱ्या 2 प्रमुख महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली. सुमारे 20 हजार 668 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांत महाराष्ट्रातील नाशिक – सोलापूर – अक्कलकोट या 374 किलोमीटरच्या कॉरिडोरसह ओडिशातील NH-326 या 206 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र अधिक गतीमान होण्यास मदत मिळणार आहे.
नाशिक – सोलापूर – अक्कलकोट कॉरिडोर हा 19, 142 कोटींचा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बीओटी तत्त्वावर (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) या कॉरिडोरच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. हा कॉरिडोर नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव व सोलापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडत पुढे आंध्र प्रदेशातील कुर्नुलपर्यंत कनेक्टिव्हिटी मजबूत करेल. हा उपक्रम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला चालना देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
6 पदरी एक्सेस कंट्रोल्ड कॉरिडोर
उल्लेखनीय बाब म्हणजे प्रस्तावित ग्रीनफिल्ड कॉरिडोरला दिल्ली – मुंबई एक्सप्रेस वे (वाढवन पोर्ट इंटरचेंज), आग्रा – मुंबई कॉरिडोर (एनच-60 – अडेगाव जंक्शन) व समृद्धी महामार्ग (पांगरी, नाशिकलगत) यांच्याशी जोडण्याचाही प्रस्ताव आहे. हा 6 पदरी एक्सेस कंट्रोल्ड कॉरिडोरमुळे देशाच्या पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत थेट वाहतुक सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत तब्बल 17 तासांची बचत होणार असून, 201 किलोमीटरचे अंतरही कमी होणार आहे.
प्रस्तावित प्रकल्पातून 251.06 लाख मॅन – डे थेट रोजगार, 313.83 लाख मॅन – डे अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. तसेच या महामार्गालगतच्या परिसरातील आर्थिक उलाढाल वाढून नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
2 टप्प्यांत बांधला जाणार महामार्ग
यासंबंधीच्या माहितीनुसार, नाशिक ते अक्कलकोट महामार्ग नाशिक ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट अशा 2 टप्प्यांत बांधला जाणार आहे. नाशिक ते अहिल्यानगर टप्पा 152 किमीचा, तर अहिल्यानगर ते अक्कलकोट टप्पा 222 किमी असेल. 374 किमीचा हा महामार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक ते अक्कलकोट अंतर केवळ 4 तासांत पार करता येणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी तब्बल 9 तास लागतात.
सुरत ते चेन्नई द्रुतगती महामार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक ते सुरत अंतर 2 तासात पार करता येणार आहे. चेन्नई ते सुरत महामार्ग नवसारी येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे पुढे दिल्लीकडे जाणेही सोपे होणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली निर्णयाची माहिती
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, पहिला प्रकल्प नाशिक आणि सोलापूरला जोडणारा सहा लेनचा अॅक्सेस-कंट्रोल्ड एक्सप्रेसवे आहे. एकप्रकारे हा प्रकल्प विकसित भारताच्या स्वर्णित चतुर्भुजचे प्रतिनिधित्व करतो. दिल्ली-मुंबई कॉरिडॉरने मोठी प्रगती केली आहे. त्यानंतर आता हा मुंबई-चेन्नई कॉरिडॉर आहे. आज ज्या सेक्शनला मंजूरी मिळाली तो नाशिक ते अक्कलकोट असा आहे. यापुढे हा कॉरिडॉर कुरनूल, कडप्पा, चेन्नईपर्यंत वाढवला जाईल. तूर्त आज नाशिक-सोलापूर कॉरिडॉरला मंजूरी देण्यात आली आहे.

