लोकसभा निवडणुकीत भाजपला सोलापूर जिल्ह्यात दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपने रणनीती बदलली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे फोडाफोडीचे राजकारण आणि अति आत्मविश्वास.. याचा फटका भाजपला नगरपालिका निवडणुकीत दिसला . दुखावलेले स्थानिक आमदार, नेते यांना आता पालकमंत्र्यांनी विश्वासात घेऊन आपल्या झालेल्या चुकांवर पडदा टाकावा लागणार आहे. तरच महापालिका निवडणुकीत यश मिळेल. सांगोल्या मध्ये भाजप, शेकाप आणि दीपक साळुंखे गटाची झालेली युती मतदारांना आवडली नाही. त्यामुळे शिंदे सेनेचे शहाजी बापू पाटील निर्विवाद सत्ता मिळवली. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची देखील सभा झाली होती शिवाय शहाजी बापू पाटील यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या होत्या त्यामुळे ही निवडणूक राज्यभर गाजली.
पालकमंत्र्यांनी माजी आमदार राम सातपुते यांना जवळ करून अकलूजचा गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मंगळवेढा, पंढरपूर, कुर्डूवाडी, करमाळा, मोहोळ, दुधनी या ठिकाणचे भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले. आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, मोहोळ चे आमदार राजू खरे, यांची जादू नगरपालिका निवडणुकीत चालली नाही. खासदार प्रणिती शिंदे यांच्या काँग्रेसला अक्कलकोट मध्ये अवघ्या दोन जागा वगळता जिल्ह्यात कुठेच यश मिळाले नाही. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट आणि मैंदर्गीवर आपली सत्ता कायम ठेवली आहे. माजी आमदार राजा राऊत यांनी स्वबळावरच बार्शी नगरपालिका भाजपच्या ताब्यात ठेवली आहे. अनगर नगरपंचायतीचा राजन पाटलांचा विजय तो भाजपचा आहे असे म्हणता येणार नाही. त्यामानाने भाजप पेक्षा एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणाने कमळाची घोडदौड रोखत जोरदार मुसंडी मारली. या सर्व पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना आत्मचिंतन करून आपली रणनीती बदलावी लागणार आहे हे नक्की.

