शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन 3000 रुपये भाव द्यावा या आग्रही मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ च्या लोकमंगल कारखाना स्थळावर सुरू असलेले आंदोलन हा अखेर मागे घेण्यात आले. प्रति टन तीन हजार रुपये भाव दिल्याशिवाय माघार नाही, अशी ठाम भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनहित शेतकरी संघटना आणि छावा संघटनेने घेतली होती. त्यामुळे रविवारपासून गव्हाणी मध्ये बसून आंदोलन करत लोकमंगल कारखान्याचे गाळप शेतकऱ्यांनी बंद काढले होते. या आंदोलनासाठी बीबीदारफळसह परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. कारखान्याचे संचालक सतीश देशमुख यांनी इतर कारखान्यापेक्षा दोनशे रुपये कमीच भाव देणार परंतु पेमेंट वेळेवर करीन अशी ठाम भूमिका घेतली होती. मात्र शेतकरी संघटना याला तयार नव्हत्या. शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान होऊ नये ही भूमिका घेऊन आज शेतकरी संघटनांनी माघार घेतली आणि तोडगा न निघाल्याने 2800 रुपयांचा दर मान्य केला. लोकमंगल साखर कारखान्याच्या दरावर इतर कारखान्याचे दर अवलंबून होते मात्र लोकमंगलची कोंडी फुटल्यामुळे इतर कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. स्वाभिमानी संघटनेचे विजय रणदिवे, तालुका अध्यक्ष विजय साठे, जनहित संघटनेचे प्रभाकर देशमुख, छावा संघटनेचे अमूल पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. तीन हजार रुपयांचा दर जाहीर न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.

