पक्षाच्या पहिल्या फळीच्या नेत्यांनी केलेल्या पक्ष बदलाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुती टिकणार का ? आघाडी होणार का ? की सर्व पक्ष स्वतंत्र लढणार ? असे प्रश्न शेवटच्या फळीतील कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाले आहेत.सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महापालिकेतील सत्ता समीकरणे जुळवण्यासाठी युती करायची की नाही याचा अधिकार भाजपच्या तीनही आमदारांना दिले आहेत.दादा, बापू आणि मालक यांच्यातील वैचारिक मतभेद पाहता युतीसाठी यांचे एकमत होईल की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, आडम मास्तरांची कम्युनिस्ट पार्टी, बसपा हे सर्वजण व्यक्तीलोभ, वैयक्तिक लोभ आणि स्वाभिमान बाजूला ठेवून भाजपा विरोधात एकत्र येऊन मोट बांधतील का; की स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतंत्र लढतील हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
गल्ली – बोळात, नगरा – नगरात,चौका – चौकात इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचे ‘भावी नगरसेवक’ असे उल्लेख असलेले विविध पोझिशन्स मधील बॅनर्स झळकत आहेत. ‘पक्षाचे जे व्हायचे ते होऊ दे. मला तिकीट मिळेल का? तिकीट मिळवावं यासाठी मला काय करावे लागेल ?, कोणत्या गॉडफादर मार्फत वशिला लावावा लागेल ? असे प्रश्न या उमेदवारांना पडत आहेत.
अनेक हौसे, नवसे, गौसे गुडघ्याला बाशिंग बांधून नगरसेवक पदाची वरमाला घालून घेण्यासाठी इच्छुक आहेत.

